सामान्य जनतेत ‘व्यायाम’ करण्याबाबत अनेक शंका आढळतात. वजन कमी करण्यासाठी, शरीरसौष्ठव मिळविण्यासाठी व्यायाम तर करायचाय; पण मिळणारे मार्गदर्शन मात्र अनेक प्रकारचे/वैयक्तिक मतानुसार आढळते. व्यायाम एवढे तास/मिनिटे करावा, एवढे किलोमीटर दररोज चालावे असे सर्वसाधारण नियम बनवून चालत नाही. आयुर्वेदाचे नियम/विचारसरणी समूहनिष्ठ नसून, व्यक्तिसापेक्ष आहेत. त्यामुळे ‘वयानुसार/वजनानुसार एवढा व्यायाम’ असा विचार करणे योग्य नाही. आयुर्वेदाने व्यायामाबद्दल काय सांगितले आहे, हे पाहू या.............
व्याख्या :
‘शरीर आयासजनकं कर्म व्यायाम:।’
शरीराला थोडा आयास (कष्ट) देणारे कर्म म्हणजे व्यायाम.
व्यायाम कुणी करावा? :
‘बलिभि: स्निग्धभोजीभि:’
शरीराला घ्यावे लागणारे कष्ट सोसण्याची ज्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता आहे आणि ज्यांच्या आहारात पुरेसे स्निग्ध पदार्थ आहेत, अशा व्यक्ती व्यायाम करू शकतात. अर्थातच जे ‘आधुनिक तेल-तूप नको’ या प्रकारच्या विचारसरणीचे अनुयायी आहेत, त्यांनी व्यायामाच्या भानगडीत न पडणे उत्तम. व्यायामामुळे शरीरात वात-प्रकोप होतो. त्यामुळे तो टाळण्यासाठी, आपल्या आयुर्वेदाच्या महर्षींनी prevention is better than cure या विचारसरणीनुसार योग्य तो विचार करूनच ही अट घातली आहे. ‘व्यायाम’ हे एक ‘साहस-कर्म’ आहे. म्हणजे (कुणा अभिनेत्याचे six-pack बघून त्याच्यासारखे शरीरसौष्ठव कमावण्यासाठी) एकाएकी आपल्या शक्तीच्या बाहेर व्यायामाला सुरुवात केल्यास जिवावर बेतू शकते. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये व्यायाम करता करता कोसळलेल्या अनेक तरुणांना आपण पाहिले असेल. त्यावरून आयुर्वेदाच्या महर्षींची ही दूरदृष्टी लक्षात येते.
व्यायाम किती करावा :
‘अर्धशक्त्या निषेव्यस्तु ....’
आपल्या क्षमतेच्या निम्म्याने व्यायाम करावा. ही क्षमता ओळखण्यासाठी कोणतीही लॅबोरेटरी टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. आयुर्वेदाने अगदी सामान्य मनुष्याचा विचार करून या अशा मापकांचे वर्णन केले आहे. व्यायामाच्या क्षमतेचे मापन दोन प्रकारांनी होते.
- उन्हाळ्याच्या दिवसांत काखेत व कपाळावर घाम येऊ लागला, की अर्ध-शक्ती झाल्याचे ओळखावे. ज्या व्यक्तींना बसून राहिले तरी घाम येत राहतो (सारखे पाझरत असतात) त्यांनी मात्र याबाबत वैद्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- थंडीच्या दिवसांत घाम कमी येतो. त्या वेळी श्वासाच्या गतीकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. श्वासाची गती लक्षात येऊ लागली (नाकाने घेतलेला श्वास पुरेसा नसल्याने तोंडाने श्वास घेण्याची आवश्यकता वाटू लागली - सुश्रुताचार्य) की अर्धशक्ती झाल्याचे ओळखावे.
यावरून एक गोष्ट लक्षात येईल, की व्यायाम एवढे तास/मिनिटे करावा, एवढे किलोमीटर दररोज चालावे असे सर्वसाधारण नियम बनवून चालत नाही. आयुर्वेदाचे नियम/विचारसरणी समूहनिष्ठ नसून, व्यक्तिसापेक्ष आहेत. त्यामुळे ‘वयानुसार/वजनानुसार एवढा व्यायाम’ हा विचार अपुरा आहे. आयुर्वेदाच्या व्यक्तिसापेक्ष विचारसरणीमुळेच प्रत्येक गोष्टीचा मानक (standard) बनविता येत नाही आणि सध्याच्या प्रचलित शास्त्रीय मानकांनुसार आयुर्वेदावर काही संशोधन होत नसल्याचा आक्षेप घेतला जातो; मात्र आयुर्वेदाची स्वत:च्या मानकांनुसार संशोधन करण्याची, पण विश्वमान्यता नसल्याने अपरिचित अशी स्वतंत्र संशोधन पद्धती आहे.
व्यायाम कोणी करू नये :
‘वातपित्तामयी बालो वृद्धोऽजीर्णी च तं त्यजेत्।’
ज्या व्यक्तीला वात-पित्तात्मक व्याधी झाले आहेत, वृद्ध व्यक्ती आणि १६ वर्षांखालील मुले यांनी शक्यतो व्यायाम करू नये. (अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यांची भेट घ्यावी).
व्यायामाचे फायदे :
लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षय: ।
विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते।।
योग्य व्यायामामुळे शरीराला हलकेपणा प्राप्त होतो, काम करण्याचे सामर्थ्य मिळते (कोणतेही सत्कार्य करण्याचा उत्साह प्राप्त होतो), भूक सुधारते, अतिरिक्त चरबी (वजन) कमी होते आणि शरीर बांधेसूद, पीळदार (packs युक्त) व घट्ट बनते.
व्यायामानंतर काय करावे :
व्यायाम झाल्यानंतर सर्वांगी सुखकर वाटेल अशा रीतीने रगडून घ्यावे.
अतिव्यायामाचे दुष्परिणाम :
क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यास तहान लागणे, क्षय (वजन कमी होणे), दमा लागणे, रक्त-पित्त (नाका-तोंडावाटे किंवा गुद-मूत्रमार्गे/योनीमार्गे रक्तस्राव होणे), थकणे, दमायला होणे, खोकला, ताप येणे, उलटी होणे अशा प्रकारचे विकार होतात. क्वचित मृत्यूही होऊ शकतो.
व्यायाम आणि योगासने यात बऱ्याच वेळा गोंधळ केला जातो. वरील नियम हे व्यायामासाठी आहेत. योगासनांसाठी नाहीत, हे कृपया लक्षात घ्यावे.
(संदर्भ : अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय - २, सूत्र क्र. ९ ते १३)
- प्रा. वै. मुरलीधर प्रभुदेसाई,
सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
संपर्क : ९४२२४ ३५३२३
ई-मेल : vdmurali13@gmail.com